वडीगोद्रीः आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसाठी मोठया संख्येने मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी येथे येत आहे. या पार्श्वभुमीवर करण्यात आलेली जेवणाची सोय. pudhari photo
जालना

Maratha reservation protest : अंतरवाली सराटीत अहोरात्र 'अन्नछत्र' सुरू

गावागावातून येतोय जेवणाचा घास, आंदोलनाला मराठा समाजाचा हातभार

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मराठा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट पासुन आंदोलन सुरू केले आहे. १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आंतरवाली सराटी येथे सकल मराठा बांधव दाखल होत आहेत. येणाऱ्या मराठा समाज बांधवांचे जेवणासह पिण्याच्या पाण्याचे हाल होउ नये यासाठी अन्न छञ सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनाला,दूर दूर वरून भेट देण्यासाठी येणारे समाज बांधवयेणाऱ्या समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी माधुकरी अन्न सेवा अंतरवाली सराटी येथे पंचक्रोशीतील गोदापट्ट्याच्या गावकऱ्यांनी सुरू केली आहे. दररोज सकाळी व सायंकाळी एका- एका गावातून ही माधुकरी जमा करून अंतरवाली सराटी येथे येणाऱ्या समाज बांधवांच्या सेवेसाठी येत आहे.

अन्न छत्रसेवा गोदापट्ट्यातील गावकऱ्यांच्यावतीने मागील तीन वर्षांपासून, अहोरात्र सुरू असुन उन्हातान्हात, अंगणात चटईवर बसून हजारो हात जेवत आहेत. ट्रॅक्टर, टेम्पो भरून शिदोरी येवुन समोर पत्रावळीवर गरमागरम भाकरी, वरण-भात आणि पिठलं, चटणी, लोणचे, उपवासाचे पदार्थ,फराळ, फळे समाज बांधवासाठी येत आहे.

मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करतात परंतु इतर सर्वांना उपाशी पोटी कसे ठेवावे.त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून गोदापट्ट्यातील गावकऱ्यांच्या वतीने माधुकरी मागुन घराघरातून पोळी-भाजी,भाकरी,चटणी,ठेचा तसेच स्वयंपाक घरात जे जमा करूनअसेल ते आंदोलनाच्या ठिकाणी जमा केले जाते.

आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने गावात आलेले समाज बांधव जिथे जागा मिळेल तिथे पंक्तीत बसून अथवा रानावणात उभे राहून भोजन करीत आहेत. आलेला प्रत्येक जण दोन घास जेवून जावा.कुणीही उपाशी राहू नये या भावनेतून परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने ही माधुकरी सेवा सुरू आहे. जो येईल तो जेवण करून जाईल याची काळजी अंतरवाली ग्रामस्थांच्या वतीने घेतली जात आहे.

या आंदोलन स्थळी मिळणारे प्रेम,सहकार्य आणि अविरत सकाळ संध्याकाळी होत असलेले अन्नदान पाहून येणारा प्रत्येक समाज बांधव गोदापट्टयातील गावकऱ्यांच्या आदर तिथ्याने भारावून जात आहे. महाराष्ट्रातील माझ्या माता-भगिनींनी जो घास पाठवला आहे, त्यात प्रेम आहे, आशीर्वाद आहे. जोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि अन्नछत्र सुरू राहील. असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेले आहे.

मनोज जरांगे यांना चार सलाईन

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना काल गुरुवारपासून शुक्रवार सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार करण्यात आहे. सकाळपासून त्यांच्या प्रकृतीला आराम पडला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. काल सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना तीन सलाईन देण्यात आली. काल रात्री ११.३० वाजता जरांगे यांनी तीव्र डोकेदुखी आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली. संयुक्त वैद्यकीय पथकाने तत्काळ तपासणी करून त्यांना औषधे दिली. त्यानंतर देखभालीचा भाग म्हणून पहाटे साडेचारपर्यंत आणखी एक सलाईनद्वारे आयव्ही फ्ल्यूड देण्यात आले. सध्या जरांगे पाटील यांना कोणतीही तक्रार नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

तीन वर्षांपासून अन्न छञ अविरत सुरू

गोदापट्ट्यातील अनेक गावाच्या गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रत्‍्येक गावातून अन्न दान केले जात आहे.त्‍यासाठी दररोज एक दिवस एका गावाचा दिवस ठरवून दिला जात आहे. दिलेल्या दिवशी त्या गावातील गावकऱ्यांनी भोजन जमा करून आंतरवाली सराटी येथे पोहोच करणे ही जबाबदारी संपूर्णपणे अंबड तालुक्यातील वाळकेश्र्वर येथील मधुकर मापारी यांच्याकडे आहे.ही जिम्मेदारी तिन वर्षांपासून ते करीत आहेत. मागील दोन दिवसांत 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला असल्याचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT