Manoj Jarange: Orders to cancel the certificate came from Bawankule himself
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे लेखी आदेश दिले आहेत, यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा, असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आ. प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली.
तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली आहे. या दौऱ्यात मराठा समाजातील विविध घटकांशी गाठीभेटी अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहोत, मात्र सरकारचा सगळ्यात मोठा प्लॅन हा आहे की, कोल्हापूर आणि सातारा संस्थानचे गॅझेट द्यायचे नाही.
मी जबाबदारीने सांगतो हा पूर्ण नियोजित कट आहे. काहीही झाले तरी सरकारला सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थांचा जीआर द्यायचा नाही. कारण कोल्हापूर संस्थानमध्ये 3 लाख 85 हजार कुणबी आहेत. हे गॅझेट त्यांना लागू करायचे नाही. हा नवीन कट रचलेला आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
जरांगे म्हणाले की, "प्रमाणपत्र पडताळणीची कायदेशीर प्रक्रिया सर्वांसाठीच असते, मग केवळ मराठा समाजाच्याच प्रकरणाची मीडिया ट्रायल का केली गेली? मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवून समाजात फूट पाडण्याचा आणि मराठ्यांच्याच विरोधात छत्रपती संभाजीनगरात आंदोलन उमे करण्याचा कट होता का?" असा सवाल त्यांनी केला.