वडिगोद्री : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस असून सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दिपके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना काही झाले किंवा त्यांच्या सुरक्षेशी खेळ झाला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा सरकारला इशारा दिला आहे.
जरांगे हे स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत. सरकारने सोनम वांगचुक यांना उचलून आंदोलन मोडीत काढण्याचा जसा प्रयत्न केला, तसा प्रयत्न जर इथे जरांगे यांच्या बाबतीत केला तर लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे! जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल असे ते म्हणाले.
उपोषण सुटण्यासाठी इतका का वेळ लागत आहे. येथे येऊन बोलायला सरकारला काय अडचण आहे? जे समाजासाठी झटत आहे त्यांच्या सोबत सरकार बोलायला तयार नाही. कॉमेडियनला बोलावून त्याला बिस्कीट द्यायला तयार आहे, असा टोलाही दीपके यांनी लगावला.
एक माणूस आपल्या समाजासाठी चौदा दिवस उपोषण करतोय, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांची भेट घेतल्यास काय बिघडणार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जनता मनोज जरांगे यांच्यासोबत खंबीरपणे उभी असून, सरकारने तातडीने या विषयावर तोडगा काढावा, अशी मागणी दीपके यांनी केली.
समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे. रोजगार भेटावा, यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिले असते, रोजगार दिला असता तर यांना काय गरज पडली असती उपोषणाला बसायची? असा सवाल दीपके यांनी विचारला.
सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना दीपके म्हणाले, या सरकारला कॉमेडीयनला भेटायला आणि त्यांना बिस्किटं खाऊ घालायला वेळ आहे, पण समाजासाठी जीवाची पर्वा न करता १४ दिवसांपासून उपाशी बसलेल्या मनोज जरांगेंशी बोलायला वेळ नाही. हे अत्यंत संतापजनक आणि अयोग्य आहे. सरकारने स्वतः इथे येऊन जरांगेंशी सन्मानपूर्वक चर्चा केली पाहिजे.