वडीगोद्री : ज्यांना यायचे ते आंदोलनात येतील, मी संकटावर मात करण्यासाठी पक्का आहे, असे सांगत शनिवार (दि. २९) पासून अंतरवाली सराटी येथे निर्णायक उपोषणाला आपण प्रारंभ करणार आहोत. गरज पडल्यास मुंबईतही जाणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे पत्रपरिषदेत सांगितले.
कुणबी प्रमाणपत्रासाठी समाजाने मरगळ झटकावी. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाहीत, त्यांनी पुन्हा अंतरवालीत येऊन अर्ज द्यावेत. तूर्त आंदोलन अंतरवालीत होणार असले तरी मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मुंबईत जाणार आहोत, असे स्पष्ट करतानाच मंत्री विखे पाटील यांनी प्रमाणपत्रासाठी फारसे अर्ज शिल्लक नसल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा दावा खोटा असून, ते समाजाला बदनाम करण्यासाठी निघाले आहेत.
विखे आपल्याला हिणवत असल्यामुळे समाजाने घरात न बसता आंदोलनात सहभागी व्हावे, असे जरांगे म्हणाले. जरांगे यांनी विखे यांच्यावर टीका केली. कारखाना, गूळ याशिवाय त्यांना काही कळत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 22 लाख नोंदी निघाल्याचे म्हटले. यावर विखे यांना विचारले असता ते म्हणाले एवढ्या तर नसतील.
मराठा उपसमितीच्या अध्यक्षांकडून अशी माहिती अपेक्षित नाही. समाजाला किती वेड्यात काढणार, फसवणार किती असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी जरांगे यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली परिसरात तगडा बंदोबस्त राहणार आहे. ३५० पोलिस कर्मचारी, एसआरपीएफच्या ६ तुकड्या, होमगार्ड आणि ५५ पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.