जालनााः बदनापूर तालुक्यातील उजैनपुरी येथे शेतीच्या वादातून एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. शेतातील सोयाबीनचे पीक फवारणीमुळे जळाल्याचा जाब विचारणाऱ्या सख्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत करण्यात आली आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी बाबासाहेब तुकाराम शिंदे (वय ४५, रा. उजैनपुरी, ता. बदनापूर) हे शेती करतात. त्यांचे आणि त्यांचा मोठा भाऊ शेषराव तुकाराम शिंदे यांचे शेत शेजारी शेजारीच आहे. सोमवारी (दि. २७ जुलै) दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाबासाहेब शिंदे हे त्यांच्या शेतात गेले असता, त्यांना त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचा काही भाग फवारणीमुळे जळालेला दिसला.
याविषयी त्यांनी मोठा भाऊ शेषराव शिंदे यांना, 'माझ्या शेतातील पीक कसे काय जळाले?' अशी विचारणा केली. विचारल्याचा राग आल्याने शेषराव शिंदे जाब याने बाबासाहेब यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच वेळी
पुतण्या समाधान याने हातातील दगड बाबासाहेब यांच्या डोक्यात हाणून त्यांना रक्तबंबाळ केले. त्यानंतर या तिघांनीही चापटबुक्क्यांनी मारहाण करत 'पुन्हा आमच्या वाटेला गेला तर तुला जिवे ठार मारू', अशी गंभीर धमकी दिली. रक्तानं माखलेल्या अवस्थेत जखमी झालेल्या बाबासाहेब शिंदे यांना रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बाबासाहेब शिंदे यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस शेषराव तुकाराम शिंदे (भाऊ), सिंधू शेषराव शिंदे (भावजय), समाधान शेषराव शिंदे (पुतण्या) या तिन्ही आरोपींवर (सर्व रा. जैनपुरी, ता. बदनापूर) भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.