Leopard terror in the Sukhapuri area; the administration is neglecting the situation.
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील सुखापुरीसह परिसरातील शेतकरी सध्या अक्षरशः मरणयातना भोगत असून, एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांचे जीवन असह्य झाले आहे. बिबट्याची वाढती दहशत, एमएसईबीचा रात्रीचा वीजपुरवठा आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे संपूर्ण सुखापुरी मंडळात भीती, संताप आणि असंतोषाचा उद्रेक झाला आहे.
सुखापुरी, रूई, कुक्कडगाव, रेवलगाव, लखमापुरी, बडीकाळ्या, बेलगाव, भारडी, दहेगाव खुर्द, करंजळा आदी गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले करून बिबट्याने फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांचे गोठेही आता सुरक्षित राहिले नाहीत! रात्रीची वेळ तर सोडाच, दिवसा सुद्धा शेतात जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
एकीकडे बिबट्याची दहशत, तर दुसरीकडे एमएसईबीची रात्रीची लाईट सक्ती"हा जणू शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार आहे.
सुखापुरी ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत काही फिडरवर दिवसा लाईट बंद ठेवून रात्री वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस, गहू, हरभरा, टरबुज यांसारख्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अंधारात शेतात उतरावे लागत आहे. बिबट्याच्या सावलीत शेती करा, असा अप्रत्यक्ष आदेशच जणू महावितरण देत आहे!
दिवसा लाईट द्यावी
गेल्या एक वर्षापासून शेतकरी सोलर पंप व दिवसा वीजपुरवठ्याची मागणी करत आहेत. सुखापुरी ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत तिन्ही फिडरवर दिवसा लाईट द्यावी, अशी सातत्याने मागणी असूनही वनविभाग, महावितरण आणि संबंधित अधिकारी कानाडोळा करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावणे, गस्त वाढवणे या प्राथमिक उपाययोजनाही केल्या जात नसल्याने संताप अनावर झाला आहे.
वरिष्ठांनी लक्ष घालावे
सध्या सुखापुरी परिसरातील शेतकऱ्यांवर संकटांचा अक्षरशः भिडीमार सुरू असून, "शेतकऱ्यांना पिळून पिळून मारले जात आहे," अशी भावना उघडपणे व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून विवट्याच्या दहशतीवर नियंत्रण आणावे.