वडीगोद्री: एक चौथी नापास माणूस काहीही मागण्या करतो आणि शासन लाचारीने त्यावर जीआर काढते; रोज सलाईन लावून कुठले उपोषण चालते? हे आंदोलन पहिल्या दिवसापासूनच बेकायदेशीर आहे. असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.
वडीगोद्री येथे शुक्रवार, दि.११ रोजी ओबीसी नेत्यांची बैठक संपल्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की मनोज जरांगे हे लोकशाही मानत नाहीत, प्रशासकीय शिष्टमंडळाचा सन्मान करत नाहीत, ते अंतरवालीत राहिले काय किंवा मुंबईत गेले काय, त्याने काहीही फरक पडत नाही.
राज्य शासनाच्या धोरणावर शरसंधान साधताना हाकेंनी संताप व्यक्त केला. जिल्ह्या-जिल्ह्यां त विशेष शिबिरे लावून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत आणि त्यांना मागच्या दाराने ओबीसी प्रवर्गात घुसवले जात आहे. यामुळे आमचा हक्काचा वाटा हिरावला जात असून ओबीसीं चे आरक्षण संपत आले आहे. असा संताप हाके यांनी व्यक्त केला.
आजवर कधी अनुसूचित जाती, जमाती किंवा ओबीसींसाठी अशी विशेष शिबिरे भरवली गेली होती का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावेळी ओबीसी नेते बळीराम खटके आदींसह इतरांची उपस्थिती होती.