परतूर : देशव्यापी कामगार संपाच्या हाकेला प्रतिसाद देत गुरुवारी परतूर येथे केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शेतमजूर, शेतकरी आणि कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लालबावटा) च्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रमसंहिता रद्द करा, मनरेगा कायद्यातील बजेट कपात मागे घ्या आणि शेतकरी विरोधी अमेरिकन करार रद्द करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
परतूर आणि मंठा तालुक्यातील शेकडो मजूर, महिला व पुरुष हातात लाल झेंडे घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या कंत्राटीकरण धोरणामुळे सुशिक्षित तरुणांना शाश्वत रोजगार मिळत नसून, पदवीधर तरुणांना अवघ्या 8 ते 9 हजार रुपयांत राबवून घेतले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी व्यक्त केला. कंत्राटी पद्धती ही आधुनिक गुलामगिरी असून, याद्वारे कंपनी मालक मजुरांची मोठी पिळवणूक करत असल्याचा आरोप युनियनच्या वतीने करण्यात आला.
वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण भागातील रोजगाराचा आधार असलेल्या मनरेगा (रोजगार हमी) योजनेच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने 40 टक्के कपात केली आहे. ही कपात म्हणजे ग्रामीण मजुरांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे कारस्थान असल्याचे मोर्चेकऱ्यांनी म्हटले. एकीकडे उद्योगपतींना लाखो कोटींचे अनुदान आणि सरकारी जमिनी बहाल केल्या जात असताना, दुसरीकडे कष्टकऱ्यांचे हक्क हिरावले जात आहेत.
संविधानाने दिलेल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि रोजगाराच्या अधिकारावर सरकार गदा आणत असून, संसद तुमच्या ताब्यात असली तरी रस्ता आमच्या ताब्यात आहे असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात मारुती खंदारे, सरिता शर्मा, भगवान कोळे, रवी भदरगे, मुक्ता शिंदे, फरीदा शेख, महादेव बुरकुले, दिगंबर मोरे, रमेश घुगे, बाबासाहेब घुगे, सिद्धेश्वर कांबळे, मनीषा वाहुळे, सीता आकात, सुभाष भदर्गे, सुभाष कामते, अर्चना कोरडे, गणेश नवघरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मजूर सहभागी झाले होते.