जालना ः जालना शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या पाणीचोरांविरुद्ध महापालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. अंबड ते जालना या मुख्य जलवाहिनीवरून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडून उद्या बुधवार, (दि. 29) रोजी सकाळी 9 वाजेपासून 70 अनधिकृत नळ कनेक्शन कापण्याची कारवाई केली जाणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरील 35 व्हॉल्व्हवर सुमारे 70 ठिकाणी बेकायदेशीरपणे टॅपिंग करून पाणी पळवले जात असल्याचे सर्वेक्षणात समोर आले होते. यामध्ये अर्धा इंची 52, पाऊण इंची 5 आणि 1 इंची 13 अशा मोठ्या जोडण्यांचा समावेश आहे. या अवैध कनेक्शनमुळे जलवाहिनीचा दाब कमी होऊन शहरात पाणीटंचाई निर्माण होत होती.
ही बाब गांभीर्याने घेत महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार ही मोठी कारवाई नियोजित करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे तगड्या बंदोबस्ताची मागणी केली आहे. महापालिकेचे तांत्रिक पथक, कर्मचारी आणि पोलिस ताफा प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल होऊन ही कटिंग मोहीम फत्ते करणार आहे.
इंदेवाडी, अंतरवाला टार्गेटवर
या मोहिमेत प्रामुख्याने इंदेवाडी परिसरात 31, अंतरवाला येथे 14 आणि गोला पांगरी परिसरात 6 अशा एकूण 51 प्रमुख अवैध जोडण्या रडारवर आहेत. याव्यतिरिक्त इतर ठिकाणचे 20 छोटे कनेक्शनही कापले जाणार आहेत. ग्रामीण भागातून ही जलवाहिनी येत असताना स्थानिक नागरिकांनी मुख्य वाहिनीला भगदाड पाडून पाणी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
अवैध जोडण्यांचा असा आहे आकडा
एकूण अनधिकृत कनेक्शन: 70
अर्धा इंची जोडण्या: 52
पाऊण इंची जोडण्या: 05
एक इंची जोडण्या: 13
इंदेवाडी परिसर: 31
अंतरवाला परिसर: 14
गोला पांगरी: 06
जालनेकरांच्या हक्काचे पाणी पळवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मुख्य जलवाहिनीवरील गळती आणि चोरी थांबल्यास शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम होईल. नागरिकांनी सहकार्य करावे.राजेश बगळे, पाणीपुरवठा अभियंता, जालना शहर महानगरपालिका.