जालना : जालना जिल्ह्यात मोठे पाऊस पडले नसल्याने ७ मध्यम व ६० लघु तलावात अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील ६० पैकी तब्बल ३८ तलावांतील पाणी पातळी अद्याप जोत्याखाली आहे.
जालना जिल्ह्यात १ जुन ते ९ ऑगस्ट या कालावधीत ३८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ४४१ मिमी पाऊस जालना तालुक्यात पडला असून सर्वात कमी पाऊस घनसावंगी तालुक्यात ३४६ मिमी पडला आहे.
जिल्ह्यात कागदावर जरी वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के पाऊस पडल्याचे दिसत असले तरी मोठे पाऊस पडले नसल्याने मध्यम व लघु तलावातील पाणी पातळी चिंताजनक आहे. ७ मध्यम प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाणी साठा आहे. ३ तलावांत ५० टक्क्यांपर्यंत पाणी साठा आहे.
लघु प्रकल्पातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.६० लघु प्रकल्पांपैकी ३८ तलावातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. १४ तलावांत २५ टक्क्यांपेक्षा कमी ४ तलावांत ५० टक्क्यांपर्यंत तर केवळ ४ तलावात ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. लघु व मध्यम तलावात समाधानकार पाणीसाठा नसल्याने आगामी काही दिवसांत मोठे पाऊस न पडल्यास रब्बी हंगामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जालना तालुक्यात चांगला पाऊस पडल्याचे कागदावर दिसत असले तरी तालुक्यातील ३ पैकी दरेगाव व जामवाडी या दोन तलावांतील पाणी पातळी जोत्याखाली असल्याचे पहावयास मिळत आहे. रिमझिम पावसावर खरिपाची पिके तरारली असली तरी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यास त्याचा फटका खरीप पिकांनाही बसणार आहे.
जालना जिल्ह्यात मोठे पाऊस पडले नसल्याने लघु व मध्यम तलावांतील पाणी पातळी चिंताजनक आहे. लघु व मध्यम तलावांत पाणी साठा नसल्याने जिल्ह्यातील विहिरी व बोअरला पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने उलटूनही पाणी साठ्यात वाढ झाली नसल्याने आगामी काळात मोठे पाऊस न पडल्यास पाणी टंचाईचे सावट गडद होण्याची शक्यता पहावयास मिळत आहे.