Jalna Rain News : Rain everywhere in Jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. ग्रामीण भागात पेरणीपूर्व कामाची लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांत परतूर तालुक्यातील श्रीष्टी मंडळात ७४ तर जालना तालुक्यातील विरेगाव मंडळात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. जिल्ह्यात अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या मागील तासांतील पावसाच्या नोंदीनुसार परतूर तालुक्यातील श्रेष्टी मंडळात ७४ मिमी, तर जालना तालुक्यातील २४ विरेगाव मंडळात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दोन्ही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने परिसरातील ओढे-नाले वाहू लागले असून शेतातील जमिनीत पेरणी योग्य ओल निर्माण झाल्याची माहिती ऐकावयास मिळाली.
यंदा पावसाने सुरुवातीला ओढ दिल्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांतील समाधानकारक पावसामुळे लवकरच मोठ्या प्रमाणात पेरण्यांना सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी सुमारे ६ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार आहे. दरम्यान, पाऊस उशिरा सुरू झाल्याने मूग व उडीद या पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. त्याऐवजी सोयाबीन, तूर, मका आणि कापूस या पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कमी पाण्यात तग धरणाऱ्या तूर आणि कापूस पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
६८.४ मिमी पाऊस
जालना जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांत १४.३ मिमी पावसाची नोद झाली आहे. जिल्ह्यात १ ते २५ जुन पर्यंत ६०.५ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत ७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. आजपर्यंत जिल्ह्यात जालना तालुक्यात ८५.१, बदनापूर ३६.३, भोकरदन ४२.३, जाफराबाद ६९.४, परतूर २०.४, मंठा २०.५, अंबड ७६.५, घनसावंगी ६८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.