दुष्काळाच्या वणव्यावर पावसाचा शिडकावा file photo
जालना

Drought News : दुष्काळाच्या वणव्यावर पावसाचा शिडकावा

मोठ्या पावसाची गरज, तलावांतील पाणीसाठा चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले, सप्टेंबरचा मध्यही सरला; मात्र जालना जिल्ह्यात पावसाची मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेला पाऊस गुरुवारी परतला. मात्र त्यात जोर नव्हता. जिल्ह्यात सर्वदुर पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी हतबल झाला आहे. आता मोठ्या पावसाची शक्यता कमी होत चालल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिकच गडद झाले आहे. ७मध्यम आणि ६० लघु तलावांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

जालना शहरासह भोकरदन व बदनापूर परिसरात गुरुवारी काही वेळ पावसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वाढलेला उष्मा काहीसा कमी झाला. जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंत केवळ ४२९ मिलिमीटर पाऊस झाला असून वार्षिक सरासरी ६०३.१० मिलिमीटरच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ७१ टक्के आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत तब्बल १७४ मिलिमीटर पावसाची तूट आहे. आजपर्यंत अपेक्षित असलेल्या पावसाच्या तुलनेतही जिल्हा पिछाडीवर आहे.

पावसाअभावी जमिनीतील ओलावा संपत चालला आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासह खरीप पिकांची वाढ खुंटली असून कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. विहिरींमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यावर ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे; मात्र पाऊसच झाला नाही तर ही धडपड किती दिवस टिकणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

सध्या जिल्ह्यातील १८ गावे आणि चार वाड्यांमधील ४२ हजार ७४३ नागरिकांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रशासनाने टँकर तसेच विहीर अधिग्रहणाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली असून २४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पावसाने आणखी दडी मारल्यास टँकरची संख्या आणि मागणी दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी वाहतूक करणाऱ्या टँकर व्यवसायाला तेजी येऊ लागली आहे. गावागावांतून पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने टँकरधारकांकडे चौकशी वाढत आहे. मात्र, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय आहे.

चाऱ्याचाही प्रश्न गंभीर

पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही आगामी काळात गंभीर बनण्याची शक्यता आहे. खरीप पिकांचे उत्पादन घटल्यास शेतातील कडबा उपलब्धता कमी होण्याची शक्यता असून पशुपालकांसमोर चारा खरेदीचे संकट उभे राहू शकते. शकते. त त्यामुळे प्रशासनाने सनाने पाणीटंचाईसोबतच चारा उपलब्धता, टँकर नियोजन आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीसाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT