Jalna News : Due to lack of rain, the crops in Ashti area started dying; Farmers face double sowing crisis
आष्टी, पुढारी वृत्तसेवाः परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
आष्टी, व परतवाडी, पांडेपोखरी, हस्तुर तांडा, कराळा, अकोली, लिखित पिंपरी, ब्राह्मणवाडी, रायगव्हाण, फुलवाडी, पळशी, लोणी, कोकाटे, हादगाव, आसनगाव, ढोणवाडी, सातारा, वाहेगाव यासह संपूर्ण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन दीड महिना उलटूनही अद्याप एकही दमदार किंवा मुसळधार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी शेतांमधील कापूस आणि सोयाबीनची रोपे पिवळी पडून करपू लागली असून तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला आहे.
पेरणीसाठी बियाणे, खते, मशागत आणि इतर शेतीकामांवर हजारो रुपयांचा खर्च करूनही आता पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरूवाती झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पेरणी केली मात्र, आता पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंचनामा करावा
दरम्यान, पावसाअभावी पिके पिवळ आहे. पाणी नसल्याने पिके सुकली आहे. यामुळे येत्य काही दिवसात पाऊस न पडल्यास खरीप हंगाम हातचा जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून परिस्थितीचा आढावा घ्यावा. दुबार पेरणीसाठी अनुदानित बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकरी करीत आहे.