सुखापुरी : पुढारी वृत्तसेवा
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे बुधवारी (दि. २) एक हृदयद्रावक घटना घडली. एका आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. सविता संतोष खरात (वय २५), मुलगा भावेश संतोष खरात (वय ५) आणि आबा संतोष खरात (वय ३) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सविता खरात यांनी प्रथम आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली. ही घटना गावाशेजारील मुसा भद्रायानी नदीवरील तलावाजवळ घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, तेव्हा ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि साजिद अहेमद, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, पोलीस कर्मचारी शिंदे, माळी, पवार, जाधव आणि गृहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. मृत विवाहिता सविता खरात या संतोष खरात यांची दुसरी पत्नी होत्या. या घटनेमागे व्यक्तिगत की कौटुंबिक कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. रात्री उशिरा पर्यंत गावात लाईट नसल्यामुळे विहिरीतील पाणी काढण्यासाठी जनरेटरची व्यवस्था केली होती. संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ टाहो फोडून रडत होते. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथे पाठविले.