जालना : योग्य वयात विवाह करणे हाच सुखी संसाराचा पाया आहे, असा सूर जालना येथील लाडली बेटी सन्मान सोहळ्यात उमटला. माहेश्वरी विवाह समितीच्या वतीने हा सोहळा रविवार, 1 रोजी मंठा रोडवरील महेश भवन येथे पार पडला.
अखिल भारतीय मारवाडी महिला सम्मेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा राठी यांनी अनेक शहरांत वयाची चाळीशी ओलांडलेल्या मुली अविवाहित आहेत. लग्नानंतर घटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी वेळेत निर्णय घेणे आवश्यक आहे, असे सांगितले.
माहेश्वरी विवाह समितीचे अध्यक्ष कांतीलाल राठी यांनी पुढील 6 वर्षांत समाजातील 45 टक्के मुली अविवाहित राहण्याची भीती व्यक्त केली. रेखा राठी यांचा सत्कार मंगला मानधानी व उर्मिला सोनी यांनी केला.
या प्रसंगी रामनिवास मानधानी, सत्यनारायण सारडा, ब्रिजगोपाल तोषनीवाल, श्यामसुंदर सोमानी, जिल्हा सभा अध्यक्ष, मनीष बहती, जिल्हा सभाअध्यक्ष, भागीरथ चरखा, श्रीनिवास लड्डा, रमेश सोनी, अनिल सोनी, माहेश्वरी विवाह समितिचे सचिव सुनील बियानी, उपाध्यक्ष ताराचंद मालपाणी, शिवरतन मुंदडा, सी. ए. डॉ. नितीन तोतला, गणेश बियानी, संतोष करवा, सहसचिव द्वारकादास मुंदडा, कोषाध्यक्ष श्यामसुंदर मंत्री (मिट्टू) आदींची उपस्थिती होती.
सहा लाडली लेकींचा सन्मान
21 वर्षांच्या आत विवाह करणाऱ्या दोन मुलींना प्रत्येकी 1 लाख रूपये तसेच वयाच्या 24 वर्षांच्या आत लग्न करणाऱ्या दोन मुलींना 31 हजारांची शगुन राशी व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. साक्षी नितीन तोतला, इशिता नितीन चेचानी यांनी पत्राचा स्वीकार केला. भूमी (ऋतुजा) संजय दरक, वैष्णवी जगदीश बाहेती, आंचल सुनील मुंदडा, सावित्री श्रीराम सिकची यांचा गौरव करण्यात आला.
मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षा विवाहातील मुख्य अडथळा ठरत आहेत. सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे.श्रीकांत लखोटीया, प्रदेश समिती संयोजक.