देऊळगाव राजा : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीला वारंवार विलंब होत असल्याच्या निषेधार्थ, विठ्ठल खेडेकर यांनी गुरुवारी (९ जुलै) मंत्रालयासमोर अनोखे आणि तीव्र आंदोलन केले.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे खात्री खेडेकर येथील रहिवासी विठ्ठल खेडेकर शेतकरी व शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते तसेच रविकांत तुपकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असलेल्या विठ्ठल खेडेकर यांनी मंत्रालयासमोरील उंच झाडावर चढून दोरी बांधत, सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी न केल्यास गळफास घेऊन जीवन संपवण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना केवळ आश्वासने आणि "तारीख पे तारीख मिळत असून प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक शेतकरी दागिने सावकाराकडे गहाण ठेवून, कर्जाच्या ओझ्याखाली जगत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कोणताही विलंब न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करून तिची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. झाडावर चढून गळफासाची तयारी केल्याने परिसरात उपस्थित नागरिक आणि पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली.
विशेष म्हणजे, यापूर्वीही बुलढाणा येथे शेतकरी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विठ्ठल खेडेकर यांनी अंगावर पेट्रोल ओतून तीव्र आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांच्या या नव्या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.