जालना,पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात हवामान विभागाने 27 ते 29 ऑगस्टदरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर बदनापुर तालुक्यातील बावणे पांगरी मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत भोकरदन, जालना व जाफराबाद तालुक्यात वीज पडून आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
जालना जिल्ह्यात यलो अलर्टनंतर बुधवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील 58 लघु प्रकल्पापैकी 23 तर 7 मध्यम प्रकल्पापैकी 2 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागांत सततच्या पावसामुळे शेतकर्यांची आवस्था अति झाले अन् रडू आले अशी झाली आहे. जालना जिल्ह्याची वार्षीक सरासरी 603 मि.मी असून गुरुवारपर्यंत जिल्ह्यात 513 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 85 टक्के आहे.जालना तालुक्यात 560, भोकरदन 460, जाफराबाद 532, अंबड 465, परतूर 500, बदनापूर 583, घनसावंगी 539 तर मंठा तालुक्यात 522 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचुन राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे संपले नसतानाच आता पुन्हा अतिवृष्टी होत असल्याने शेतकरी सरसगट नुकसानभरपाई देण्याची मागणी करीत आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मका आदी पिकांना पावसामुळे मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली असून रोगांचाही प्रादुर्भाव पिकांवर झाल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात बुधवारपासून भोकरदन, जाफराबाद व जालना तालुक्यात वीज पडून आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
यलो अलर्ट जारी झाल्यानंतर बुधवारी विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात मागील चोवीस तासांत आठ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.त्यात जालना तालुक्यातील सोलगव्हाण येथे एक गाय व एक वासरू, भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे, आन्वा,अवघडराव सावंगी, बनेगाव तसेच जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे गाय व बैलांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
जालना शहरास पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी कुंडलिका नदीही दुथडी भरून वाहात आहे.
जालना जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्पांपैकी जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा व बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना हे दोन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.