Jalna district faces severe water shortage!
संघपाल वाहूळकर
जालना : जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागल्याने जलस्रोत तळ गाठू लागले आहेत. परिणामी, जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई हळूहळू आपले पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत तब्बल ८० टँकरच्या फेऱ्या सुरू कराव्या लागल्या आहेत. यामध्ये एकट्या बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ३८ फेऱ्या सुरू असून, बदापूर, भोकरदन आणि जाफराबाद या तीन तालुक्यांतील एकूण ७३ हजार ३९३ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीप-रवठा विभागाने ७ मे पर्यंतचा जो अहवाल सादर केला आहे, त्यानुसार जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आहे. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक २२ टँकरद्वारे ४२,४४६ लोकसंख्येला पाणी पुरवले जात आहे. दाभाडी, खामगाव, धामणगाव यांसारख्या गावांमध्ये टँकरच्या खेपा वाढल्या आहेत.
जाफ्राबाद तालुक्यात माहोरा, भारज आणि जानेफळ या पट्ट्यात १२ टँकरच्या माध्यमातून २७खेपा सुरू आहेत. भोकरदन तालुक्यात ७ टँकरद्वारे १५ खेपा सुरू असून ८,३०० नागरिक टंचाईचा सामना करत आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता (यां.) यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. जालना, परतूर, मंठा, अंबड आणि घनसावंगी या तालुक्यांत सध्या टँकरची मागणी नसली तरी वाढत्या उन्हामुळे आगामी काळात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यावर देखील लवकरच काम सुरू होईल.
७०१ गावांत उपाययोजना
जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईसदृश गावे व वाड्यांची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली असून ७३१ विहिरी अधिग्रहण, ५६१ दुरुस्ती, १४० उपाययोजना प्रमुख योजना राबवण्यात येणार आहे. यात नवीन विहीर खोदकाम, विहिरी विशेष दुरुस्ती, नळयोजना दुरुस्ती व तात्पुरत्या योजना, खाजगी विहिरी अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलसंधारण व जलशुद्धीकरण, विहिरी खोली करणे, गाळ काढणे आर्दीसह जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत.
४६ खासगी विहिरींचे अधिग्रहण
टैंकरव्यतिरिक्त पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विहीर अधिग्रहणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकरसाठी ३४ तर टैंकर व्यतिरिक्त १२ विहिरींचा समावेश आहे. भोकरदन तालुक्यातील नळणी बु., वजिरखेडा आणि जवखेडा ठोंबरी येथील शेतकऱ्यांच्या विहिरींचे अधिग्रहण करून तहानलेल्या गावांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.