जालना : मागासवर्गीयांच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप जातीअंत संघर्ष समितीचे राज्य समन्वयक कॉ. शैलेंद्र कांबळे यांनी समितीच्या पार पडलेल्या दुसऱ्या अधिवेशनात केला.
अधिवेशन रविवार, दि.१३ रोजी सिटू भवन, संजय नगर येथे पार पडलेल्या अधिवेशनाचे उद्घाटन माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. मारुती खंदारे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जातीअंत संघर्ष समितीचे राज्य समन्वयक कॉ. शैलेंद्र कांबळे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. मधुकर मोकळे तसेच डॉ. सुनंदा तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शैलेंद्र कांबळे यांनी समाज कल्याण विभागाच्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. मागासवर्गीयांच्या विकासासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असलेला निधी अपेक्षित पद्धतीने खर्च न करता तो इतरत्र वळविला जात असल्यामुळे मागासवर्गीय समाजाला त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कॉ. मारुती खंदारे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या दलित-आदिवासी आणि गरीबविरोधी धोरणांवर टीका केली. गोरगरीब कष्टकरी अनेक वर्षांपासून कसत असलेल्या गायरान जमिनी अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांच्याकडून काढून घेण्याचे प्रयत्न होत असून, दुसरीकडे या जमिनी भांडवलदारांच्या हितासाठी वापरण्याचे धोरण राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या अधिवेशनात मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहांच्या प्रश्नावर लढा तीव्र करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच जातीय भेदभावाच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र करणे, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे आणि मागासवर्गीयांचा सरकारी नोकऱ्यांमधील प्रलंबित बॅकलॉग तातडीने भरणे, असे महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी उपस्थितीत मान्यवरानी मार्गदर्शन केले.
यावेळी रवी भदरगे, दिगंबर मोरे, अशोक साळवे, रेखा काकडे, सुभाष शेजुळ, रितेश घुगे, संदेश शेजुळ आणि संतोष खरात यांच्यासह समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
निमंत्रकपदी अनिल मिसाळ यांची निवड
या अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी समिती गठीत करण्यात आली असून निमंत्रकपदी अनिल मिसाळ यांची निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी डॉ. सुनंदा तिडके, कॉ. मधुकर मोकळे, सुशील वाघमारे, भगवान कोळे, बाबासाहेब पाटोळे, वैजनाथ लोंढे, हरिश्चंद्र लोखंडे, गौरव चव्हाण, विलास सोनवणे आणि पोपट मोरे यांची निवड करण्यात आली.