Livestock Attacks Jalna
भोकरदन : बोरगाव तारू, वालसा खालसा आणि शिरसगाव-वाघ्रळ शिवारात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत शेळ्या आणि जनावरांच्या गोठ्यांवर हल्ले केले. शनिवारी आणि रविवारी रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये दहा शेळ्या आणि दोन वासरांचा मृत्यू, तर एक वासरू गंभीर जखमी झाले. सलग दोन रात्री झालेल्या या घटनांमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यात अंजनाबाई धसाळ यांच्या चार शेळ्या, रवींद्र धसाळ यांच्या दोन शेळ्या, तसेच विष्णू जाधव आणि राधाकिसन जाधव यांच्या प्रत्येकी एका शेळीचा मृत्यू झाला. याशिवाय अंकुश आबिलवादे यांचे एक वासरू ठार झाले, तर दुसरे वासरू गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्याचा पंचनामा केला. मात्र, त्याच रात्री शिरसगाव-वाघ्रळ शिवारात पुन्हा वन्यप्राण्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दीपक श्रीरंग इंगळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन बकऱ्या आणि भगवान सोनवणे यांच्या एका वासराचा मृत्यू झाला.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ आणि परिसरातील शेतशिवाराची पाहणी केली. यावेळी आढळलेल्या पाऊलखुणांची तपासणी केली असता, हल्ला करणारे प्राणी लांडगे असावेत, असा प्राथमिक अंदाज वन विभागाचे कर्मचारी योगेश डोमळे यांनी व्यक्त केला.
सलग दोन रात्री पशुधनावर हल्ले झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. वन विभागाने या भागात गस्त वाढवून हल्लेखोर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी आणि पशुपालकांकडून होत आहे.