जालना : १५ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्हाभरातील पिके पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कपाशीची बोंडे सडली आहे. सोयाबीनला कोंब फुटली आहे. मकासह फळबागांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पावसाच्या या तडाख्याने शेतकरी पुरता हतबल झाला असून, साहेब, दिवाळी कशी गोड होईल, आमच्या पदरात मदत द्या, अशी आर्त हाक शेतकरी शासनाला देत आहे.
दरम्यान, जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला. सुमारे ३२ गावं पाण्याखाली गेली. उसनवारी करून काळ्या आईच्या उदरात बी-बियाणे पेरले. महागडे औषध फवारले. पिके हातातोंडाशी आली असतानाच निसर्गाने कहर केला. शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. यंदाच्या पीकपाणीतून पुढच्या भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या ताटात निसर्गाने माती कालवली. अस्मानी संकटाशी तोंड देत शेतकरी आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी झटत आहे.
महागाई, महागडे बी-बियाणे, खते, शेतकरी. यंदा तरी चांगले उत्पन्न पावसाचा अनियमितपणा, वाढती औषधी यांनी पिळून निघालेला होउन आपली कर्ज फिटेल यासाठी प्रयत्नरत असतो. मात्र, यंदा अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे पुरती शेती वाया गेली. शेतकरी सरकारकडे भरीव मदतीची अपेक्षा करताना दिसत आहे.
सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कष्ट करून लावलेली पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. आर्थिक अडचणींमध्ये असताना आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी आहे.संदीप खरात, शेतकरी, रोशनगाव
अतिवृष्टीमुळे आमची पिकं पाण्यात बुडून गेली. कित्येक दिवसांपासून कष्ट करून लावलेली पिकं डोळ्यासमोर नष्ट झाली. आता घर चालवायचं कसं, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.विष्णू पिवळ, शेतकरी, दरेगाव
पिकं सडली, कापूस वाती झाला... आमच्या घामानं उगवलेलं सगळं पाण्यात गाडलं गेलं. लेकरांचं पोट भरायला काहीच उरलं नाही. आता सरकारनं तत्काळ मदत केली नाही तर आम्हाला जगणंही कठीण होईल!आनंद वाढेकर, शेतकरी, श्रीकृष्ण नगर
अतिवृष्टीमुळे आमची जीव तोडून लावलेली पिकं एका रात्रीत माती झाली. कर्ज काढून शेती केली होती, आता हाती काहीच राहिलं नाही. घर कसं चालवायचं, लेकरं कशी वाढवायची, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारनं तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, हीच आमची विनंती.रावसाहेब ढगे कृषी भूषण शेतकरी, सिरसवाडी.