शहागड/वडिगोद्री; पुढारी वृत्तसेवा : अबंड तालुक्यातील अंकुशनगर येथील समर्थ बॅंकेसमोर बुधवारी (दि. २०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास छ. सभांजीनगर कडून बीडकडे जाणारी भरधाव चारचाकीने उभ्या असलेल्या कंटेनर पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन तरुण, एक सात वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे. कंटेनरमध्ये घुसलेली कार काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.
अंकुशनगर येथील एक कंटेनर चालक कंटेनर उभा करुन एटीएममधे पैसे काढण्यासाठी गेला असता छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगाने येणारी चारचाकी (क्र.एम.एच.20 बी.एन.7073) उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून आदळली. कारमधे प्रवास करीत असलेले तिघेजण अपघातात जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कटनेरच्या पाठीमागून आतमध्ये घुसलेल्या कारला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. कारचालक रवि पांडुरंग जाधव (रा.जवाहार काॅलनी, छ.सभांजी नगर) यांच्यासह एक सात वर्षीय मुलगी व एक पंचवीस वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. यातीली दोघा मयतांची नावे समजू शकली नसल्याने त्यांचे मृतदेह पाचोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.
घटनास्थळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे, पोलीस कर्मचारी दिपक भोजने, शाकेर सिदिकी, चालक यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयतांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय पाचोडला पाठवले आहे. आयआरबीचे बाळू चित्रे, सुदर्शन नाटकर या कर्मचाऱ्यांसह आयआरबी रुग्णवहिकेचे चालक-डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत राष्ट्रीय महामार्ग सुरळीत केला.