जाफराबाद- अनुसूचित जार्तीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात जाफराबाद शहरात मंगळवार, दि. २८ रोजी विविध आंबेडकरी सामाजिक संघटना व समन्वय समितीच्या वतीने भव्य जनआक्रोश महामोर्चात काढण्यात आला. हातात निळे झेंडे, भारतीय संविधानाच्या प्रती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि मागण्यांचे फलक घेऊन निघालेल्या मोर्चामुळे शहरातील प्रमुख रस्ते निळेमय झाले होते. 'जय भीम', 'संविधान बचाव', 'उपवर्गीकरण रद्द करा', 'एकच मिशन-संविधान संरक्षण' अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या महामोर्चामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत विविध मान्यवरांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर टीका करत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण हा संविधानाच्या समतेच्या तत्त्वांवर घाला असल्याचा आरोप केला. शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
सभेला लाँग मार्चचे मुख्य प्रणेते सिद्धार्थ शिंगारे, प्रा. डॉ. ह. नी. सोनकांबळे, दादासाहेब शेळके, अजय सरोदे, सिद्धार्थ सुरडकर आणि रख्मिणीताई लोंढे यांनी मार्गदर्शन केले. वक्त्त्यांनी अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
महामोर्चानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासकीय
अधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या महामोर्चान शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने तहसिलदारांच्या प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही बीड ते दिल्ली असा सुमारे १,३०० किलोमीटरचा पायी लाँग मार्च काढणार आहोत. संविधान दिन, २६ नोव्हेंबरपासून या पदयात्रेला सुरुवात होईल आणि सलग दोन महिन्यांचा प्रवास करत २६ जानेवारी रोजी दिल्लीत पोहोचून आंदोलन छेडले जाईल. उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील.
- सिद्धार्थ शिंगारे, लाँग मार्चचे मुख्य प्रणेते.