जाफराबाद ः येथील एसटी आगारात मोठ्या गाजावाजात इलेक्ट्रिक एसटी बससाठी तब्बल सात चार्जिंग पॉइंटची उभारणी करण्यात आली आहे. जवळपास महिनाभरापासून या चार्जिंग पॉइंटचे काम पूर्णत्वास गेले असून आगार इलेक्ट्रिक बसच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. मात्र, अद्याप एकही इलेक्ट्रिक बस जाफराबाद आगाराला उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीद मनात ठेवून लालपरीने वर्षानुवर्षे अखंड प्रवासी सेवा दिली आहे. काळानुसार एसटी महामंडळातही मोठे बदल होत असून प्रवाशांच्या सोयीसाठी हिरकणी कक्ष, सुलभ स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग पॉइंट, ऑनलाइन तिकीट व्यवस्था, वाय-फाय सेवा यांसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच महिला, दिव्यांग, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह 44 प्रकारच्या प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलतीच्या योजना लागू करण्यात आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर जाफराबाद आगारासाठी 25 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. या बसेससाठी आवश्यक चार्जिंग पॉइंटचे काम पूर्ण झाले असून कार्यालयीन कामही प्रगतिपथावर आहे. यासाठी ‘इव्हीइवाय’ कंपनी व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात करार झाला आहे. या बसेसवर ‘मोरया’ कंपनीचे चालक तर एसटी महामंडळाचे वाहक कार्यरत राहणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत 12 मीटरच्या सात बसेस एका चार्जमध्ये सुमारे 300 किलोमीटर अंतर पार करणार आहेत, तर 9 मीटरच्या 14 बसेस दोन तासांच्या चार्जिंगमध्ये सुमारे 200 किलोमीटरचा प्रवास करू शकतील. 12 मीटरच्या बसमध्ये 55 प्रवाशांची तर 9 मीटरच्या बसमध्ये 40 ते 42 प्रवाशांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
व्यवस्था करून कित्येक महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने तातडीने इलेक्ट्रिक बसेस जाफराबाद आगाराला उपलब्ध करून द्याव्यात आणि सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
जाफराबादला बीडच्या बसच चार्जिंग
सध्या बीड आगाराच्या दोन इलेक्ट्रिक बसेस बीड-जाफराबाद मार्गावर धावत असून त्यांचे चार्जिंग जाफराबाद आगारात केले जाते. मात्र, दुर्दैवाने आजतागायत जाफराबाद आगाराला स्वतःची एकही इलेक्ट्रिक बस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे तालुक्यासह इतर जिल्ह्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.