Horrific accident at Javkheda Phata; auto-rickshaw driver killed in collision with Eicher truck.
जाफराबाद : प्रतिनिधीजाफराबाद-माहोरा मार्गावरील जवखेडा फाट्याजवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. मिरची वाहतूक करणाऱ्या भरधाव आयशर (एम एच २० सी सी ३०२५) वाहनाने मालवाहू रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात जाफराबाद येथील मालवाहू रिक्षाचालक संदीप जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर धडकेनंतर रिक्षा उडून दुचाकीवर आदळल्याने जानेफळ येथील गणेश पंडित व विकास पंडित हे दोघे गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जवखेडा फाट्याजवळ मिरची वाहतूक करणारे आयशर वाहन भरधाव वेगाने येत असताना मालवाहू रिक्षाला समोरून जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की रिक्षा काही अंतरावर फेकली जाऊन दुचाकीवर आदळली. या घटनेत दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जाफराबाद पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली व रस्ता सुरळीत केला. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक वासुदेव पवार, पोलीस कर्मचारी चंद्रकांत म्हस्के, खार्डे व सुरुशे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्याची कार्यवाही केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
भरधाव मिरची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी
जाफराबाद परिसरातून मिरचीची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या आयशर व इतर अवजड वाहनांचा वेग अनेकदा धोकादायक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या वाहनचालकांना वेग कमी करण्याबाबत अनेकदा सूचना करण्यात आल्या असतानाही काही चालकांकडून बेफाम वेगाने वाहने चालविली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आरतखेडा फाट्यावर झालेल्या या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेफाम वेगाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे