Heavy rain lashed the city for two and a half hours; the Kundalika River overflowed
जालना, पुढारी वृत्तसेवाः दीर्घ खंडानंतर बुधवार, दि. २४ रोजी भल्या पहाटे ३ ते ६ आणि दुपारी १२.३० ते २. ३० वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील सोनल नगर, संग्राम नगर, आदींसह सखल भाग पाण्याखाली गेला. तर जमुना नगरला जोडणारा रेल्वेस्थानक परिसरातील बोगद्यात खोलवर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, जवळपास महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर बुधवार खऱ्या अर्थाने पाऊसवार ठरला. भल्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपले. तीन तास चाललेल्या संततधार पावसाने शहरातील उंच सखल भागात पाणी साचले. त्यानंतर पुन्हा दुपारी १२.३० ते २.३० वाजेच्या सुमारास झालेल्या दमदार पावसाने दुरावस्थेत असलेल्या कुंडलिका आणि सीना नद्या खळखळून वाहिल्या.
शिवाय, रामतीर्थ स्थानभूमी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे बंधारा देखील पहिल्याच पावसात ओव्हर फ्लो झाला. अंबड चौफुली ते मंठा चौफुलीला जोडणारा रोहणवाडीकडे जाणारा मार्ग कुंडलिकेचे पाणी वाढल्यामुळे काही काळ बंद करावा लागला. यासाठी शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती व पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मगरे यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना केल्या.
महावीर ढाक्का यांची सोनल नगरमध्ये पाहणी
मुसळधार पावसामुळे प्रभाग क्र. ९ मधील सोनल नगर परिसरात रस्त्यांवर पाणी साचून काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार केली. याची तातडीने दखल घेत नगरसेवक महावीर ढाक्का यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी महानगरपालिकेकडे नाल्यांची त्वरित स्वच्छता व पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
वीजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त
पावसाचे दोन थेंब जरी पडले तरी, बत्ती गुल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, लहान बालक यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, वारंवार होत असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे अनेक कामे खोळंबली आहे. विद्युत पुरवठा नियमित होत नसल्याने याचा रुग्णसेवेवर देखील ताण पडत असल्याचे दिसून येत आहे.
१०२.९ मिलीमीटर पावसाची नोंद
शहरात बुधवार दि. २४ रोजी भल्या पहाटे झालेल्या पावसाची सकाळी आठ वाजेपर्यंत १०२.९ मिलीमीटर इतकी नोंदली गेली. दुपारी साडे बारा ते अडीच वाजेपर्यंत चाललेल्या पावसाने शहराला पुन्हा झोडपले. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला.