Jalna News : लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिल्यास ग्रामसेवक जबाबदार  File Photo
जालना

Jalna News : लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिल्यास ग्रामसेवक जबाबदार

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आ. संतोष दानवे यांचा ग्रामसेवकांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

Gram Sevak is responsible if the beneficiary is deprived of housing

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यासाठी २५ हजार घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. इतकी मोठी घरकुल मंजुरी मिळाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पात्र लाभार्थी घरकुलाच्या सुविधेपासून वंचित आहेत. विविध गावांमध्ये जात असताना अजूनही काही कुटुंबे पत्र्याच्या किंवा जीर्ण घरात राहतात, हे वास्तव असल्याचे दानवे म्हणाले. घरकुल योजनेताली पात्र लाभार्थी वंचित राहिल्यास संबंधिक ग्रामविकास अधिकारी जबाबदार धरण्यात येईल, अशा इशारा आ. संतोष दानवे यांनी दिला.

पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संतोष पाटील दानवे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती विनोद गावंडे, माजी उपसभापती सुखलाल बोडके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत, गटविकास अधिकारी महेंद्र साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकुमार गिरे, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश ठाले, संतोष वाघ, ऋषिकेश पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. दानवे म्हणाले की, पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी ग्रामसेवकांनी लाभार्थ्यांच्या मागणीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या गावातील पात्र व वंचित कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना घरकुल योजनेत समाविष्ट करणे ही ग्रामसेवकांची प्राथमिक जबाबदारी आहे. जर एखाद्या गावात पात्र लाभार्थी वंचित राहिले तर संबंधित ग्रामसेवकास थेट जवाबदार धरून त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा आमदार दानवे यांनी यावेळी बोलताना दिला. घरकुल हप्ता मिळवण्यासाठी पैशांची मागणी करू नका थेट माझ्याशी संपर्क साधा घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत आमदार दानवे म्हणाले, घरकुलाचा दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पैशांची मागणी करणार नाही.

जर अशा प्रकारची मागणी झाल्यास लाभार्थ्यांनी कोणतीही भीती न वाळगता थेट माझ्याशी संपर्क साधावा. मी स्वतः तत्काळ कारवाई करेन. पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय विना विलंब हप्ते मिळावेत, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

या अभियानामुळे ग्रामपंचायतींना विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची निवड होईल आणि त्यांना राज्य शासनाकडून भरघोस आर्थिक पारितोषिक देण्यात येईल. यामुळे गावागावांत निरोगी स्पर्धा निर्माण होऊन सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असे ते म्हणाले. यावेळी अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.

विकास हेच ध्येय

घरकुल योजना, समृद्धी पंचायतीराज अभियान व इतर विकास योजनांमधून सामान्य माणसाचा विकास साधणे हेच आपले ध्येय आहे.

गावोगाव भ्रष्टाचार, अतिक्रमण आणि अन्याय यांना पूर्णविराम देऊन प्रत्येक गावाचा विकास व प्रत्येक नागरिकाचा सन्मान साध्य करणे हे माझे वचन आहे.

यासाठी जनतेनेही प्रामाणिकपणे सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संतोष दानवे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT