Government constructions will be done with artificial sand: Revenue Minister Bawankule
अंबड, पुढारी वृत्तसेवा : राज्यात लवकरच कृत्रिम वाळू धोरण आणणार असून सर्व शासकीय बांधकामे यापुढे कृत्रिम वाळूने होणार असल्याची महत्त्वाची घोषणा महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
अंबड येथील मत्स्योदरी देवीच्या प्रांगणातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात शुक्रवार (८) रोजी महसूल सप्ताहाच्या समारोपा निमित्त अयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जालना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, आ. बबनराव लोणीकर, आ. अर्जुनराव खोतकर, आ. संतोष दानवे, माजी आ. विलासराव खरात, विभागीय आयुक्त योगेश पापुळकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक बंसल, अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रू पी.एम., तहसीलदार विजय चव्हाण, मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांची उपस्थिती होती.
पुढे बावनकुळे म्हणाले की, नदीतून वाळूची चोरी थांबविण्यासाठी आता राज्यात दगड खदानीतून कृत्रिम वाळू धोरण येणार आहे. एकट्या जालना जिल्ह्यात आमचे महायुतीचे सरकार हे ५० क्रशर मशीन देणार आहेत. काही प्रमाणातील नदीतील वाळू ही टेंडरद्वारे दिली जाणार असुन शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के पाणंद रस्ते मोकळे करून दिले जाणार असून हे रस्ते यापुढे १२ फुटांपेक्षा कमी असणार नाहीत. त्यामुळे शेतकरी व सर्व साधारण लोकांचे प्रश्न सुटणार आहे.
टीव्हीवर चेहरा दिसण्यासाठी रोहित पवारांचा प्रयत्न
एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आल्याचे रोहित पवार म्हणाल्याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता बावनकुळे म्हणाले कि, टीव्हीवर दिवसभर चेहरा दिसण्या साठी काही जण असे बोलतात असा टोला बावनकुळे यांनी रोहित पवारांना लगावला. दरम्यान सनातन दहशत वादाच्या मुद्यावर पृथ्वीराज चव्हाणांच्या कानशिलात लगावण्याची भाषा सुधाकर चतुर्वेदी यांनी केली होती. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत असं बोलणे योग्य नसल्याचे सांगून कोणाच्या कानशिलात लगावण्याची भाषा कोणी करू नये असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.