जालना : जालना शहरातील वॉर्ड क्रमांक 7 अंतर्गत येणाऱ्या मामा चौक ते बाबा टी हाऊस या मुख्य मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यालगत साचलेला कचरा, गटारांमधून वाहणारे सांडपाणी आणि सर्वत्र पसरलेली दुर्गंधी यामुळे नागरिकांना अस्वच्छ वातावरणात वावरावे लागत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक दिवसांपासून या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर साचलेल्या कचऱ्यामुळे आणि दूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या या आहेत मागण्या
रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा उचलावा, गटारांमधून वाहणारे सांडपाण्याचा निचरा करावा, दुर्गंधीमुळे त्रास थांबवण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न करावे, नियमित स्वच्छतेचा अभाव, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका