Fruit prices increase by 20 percent
आन्वा, पुढारी वृत्तसेवा रमजानचा महिनाही सुरू झाला असून फळांना मागणी वाढू लागली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने फळांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डाळिंब, सफरचंद, चिकू, अंजीर, मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे.
सफरचंदाचे दर २०० तर डाळिंब, १५० रुपये पार गेले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांची पावले आपूसकच फळांच्या स्टॉलकडे पाणीदार फळे खरेदी करण्याकडे वळतात. वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळांना फेब्रुवारी महिन्यापासून मागणी वाढली आहे.
मागील आठवड्यापासून रमजान महिन्यानिमित्त रोजे उपवास सुरू झाले आहेत. रोजे सोडण्याच्या वेळी फळांचे सेवन केले जाते. यामुळे बाजारात आता विविध फळांना मागणी वाढली आहे.
यामध्ये खरबूज, टरबूज, डाळिंब, द्राक्ष, संत्री, मोसंबी आदी फळांना अधिक मागणी आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात फळांची आवक कमी आहे. त्यामुळे फळांचे दर वाढले आहेत. सफरचंद २०० रुपयांवर पोहोचले आहे. डाळिंबाचा दरही प्रतिकिलो १०० ते १५० रुपये झाला आहे. द्राक्ष, अंजीर, पेरू १०० रुपयांवर गेले आहे. दोन महिन्यांपूर्वी स्वस्त झालेली पपई आता ६० रुपये किलो आहे.
दोन महिने भाव राहील उन्हाळ्यात दरवर्षी दर वाढत असतात. रमजान महिन्यात फळांना मागणी आहे. मात्र, फळांची आवक कमी असल्याने दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. पावसाळ्यापर्यंत फळांचे दर चढेच राहतील.-अस्लम पठाण, फळ विक्रेता
फळांचे दर
अननस-५० रुपये प्रति नग, मोसंबी २० ते ४० रुपये प्रति किलो, संत्रा-४० ते ५० रुपये प्रति किलो, आंबा १५० ते २५० रुपये प्रतिकिलो, डाळिंब १०० ते १५० रुपये प्रतिकिलो, कलिंगड ३० ते ४० रुपये प्रति नग, खरबूज ४० ते ५० रुपये प्रतिकिलो, पपई ४० ते ६० रुपये प्रतिकिलो, चिक्कू - ८० ते १०० रुपये प्रतिकिलो.