आन्वा, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात पावसाच्या ५० दिवसांपेक्षा जास्त मोठ्या खंडामुळे खरीप पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. कापूस, सोयाबीन, तूर आणि मका यांसारखी पिके पाण्याअभावी वाळू लागल्याने शेतकऱ्यांवर गंभीर संकट ओढवले आहे. मोठे पाऊस न पडल्यास खरीपा पाठोपाठ रब्बीही धोक्यात येणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यावर पावसाची अवकृपा. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, एक-दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. जुलैच्या उत्तरार्धात पावसाने काही प्रमाणात चांगली हजेरी लावल्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस न झाल्याने पिकांचे अतोनात नुकसानग्रस्त झाले आहेत. गेल्या पन्नास दिवसांपासून पावसाचा थेंबही नसल्याने परिर्सथीती बिकट झाली आहे.
जवळपास ऐंशी टक्के मान्सूनचा हंगाम झाला आहे. मात्र असे ● असतानाही भोकरदन तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्पांमध्ये मृत जलसाठा आहे. कमी पावसामुळे परिसरातील नदी, नाले देखील पूर्णपणे प्रवाहित झालेले नाहीत. आणि त्याचा विपरीत परिणाम पाण्याच्या पातळीवर होत आहे व भविष्यात देखील होणार आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.- पांडुरंग माऊली सिरसाठ, शेतकरी वाकडी