जालना : पुढारी वृत्तसेवा
भोकरदन तालुक्यातील पारध येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली आहे. एक दिवस अगोदर पारध येतील दोन शेतकऱ्यांच्या गाड्या रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्या होत्या. शेतकरी शंकर बालू लोखंडे यांची एचएफ डीलक्स MH20FF5819 तर दुसरी संजय तेलंग्रे यांची बजाज कंपनीची प्लॅटिना MH21AA3596 या दोन्ही गाड्या समोरासमोर गल्लीत उभ्या होत्या, रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही गाड्या चोरीला गेल्या.
या दोन्ही गाड्या सकाळी वालसांगवी रोड नाक्याजवळ आढळून आल्या होत्या. या दोन्ही गाड्या त्याच गाड्या होत्या ज्या चोरीला गेल्या होत्या. तर या ठिकाणची दोन घरं फोडण्यात चोरांना अपयश आले. त्यातील एक घर उत्तम लोखंडे यांचं घर फोडण्यात आलं होतं. रात्रीच्या सुमारास चोरांनी येऊन दरवाजाची कडी वाकवून घरात असलेले कपाट फोडले. त्यामधील लहान मुलीचे काही चांदीचे व सोन्याचे दागिने व काही कपडे साड्या चोरांनी लंपास केल्या.
एक दिवस होत नाही, तोच लगेच दुसऱ्या दिवशी शेतकरी संजय देशमुख यांचे शेत पारध वालसांगवी रोडवर आहे. या रोड लगतच बैलांचा गोठा आहे. तिथून त्यांची बैल जोडी रात्रीच्या सुमारास चोरीला गेली. एन पेरणीच्या तोंडावर बैल जोडी गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पारध येथे चोरट्यांची दहशत पसरली आहे.
गावातील नागरिकांच्या गाड्या चोरीला जाणे, घरफोडीच्या घटना होणे. शेतकऱ्यांच्या बैल जोडीचीही चोरी होणे, या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. चोरीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी चोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर जरब निर्माण करावी अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.
पारध येथे सलग दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यामुळे गाव आणि परिसरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोक हे दहशतीखाली वावरत आहेत. त्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून लोकांना आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्याची सुद्धा गरज आहे.अझहर पठाण (समाजसेवक)