Farmers hit twice by rising fertilizer prices
पारध, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात यंदा मिरची, सोयाबीन, मका आणि कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना खतांची मोठी गरज असतानाच खतांच्या दरात झालेली वाढ त्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारी ठरत आहे.
मे महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये अनेक खतांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०:२०: १३ खताचा दर मे महिन्यात सुमारे दिड हजार रूपये होता. तो ऑगस्टमध्ये दोन हजार २५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास सातशे पन्नास रूपयाची वाढ झाली आहे. १८:१८:१० खताचा दर १३०० रुपयांवरून १४५० रुपये, तर १०:२६:२६ खताचा दर एक हजार ६५० रुपयांवरून दोन हजार १५० रुपये झाला आहे.
डीएपीचा दर शंभर रूपयानी वाढ झाल्याने दर १४५० रूपयापर्यत पोहचल आहे. १५:१५:१५ खताचा दरात तब्बल चारशे रूपयांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात १९५० रूपयांना मिळत आहे. युरियाबाबतही शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. युरियाचा हमीभाव २६६ रुपये असताना काही ठिकाणी तो ३५० ते ४०० रुपयांना विकला जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
त्यामुळे शासनाने खतांच्या दरावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, खतांचे दर वाढत असतानाच पारध परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाचा मोठा फटका बसत आहे. चांगल्या दर्जाच्या मिरचीला सध्या बाजारात केवळ २० ते २२ रुपये किलो, तर मध्यम दर्जाच्या मिरचीला १७ ते १८ रुपये किलो दर मिळत आहे.
शेतमालाला भाव द्या
"खतांचे दर वाढले, पावसाची अनिश्चितता आणि मिरचीला कमी भाव" अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने खतांचे दर नियंत्रणात आणून मिरचीसह इतर शेतमालाला योग्य भाव मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.