वडिगोद्री, पुढारी वृत्तसेवाः खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (गळीतधान्य-सोयाबीन) अंतर्गत १०० टक्के अनुदानावरील सोयाबीन वाटप प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. यास शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. गावागावातून शेकडो अर्ज दाखल झाले. मात्र आता बियाणे वितरणासाठी शेतकऱ्यांची निवड होत नसल्याने ही योजना असून अडचण नसून खोळंब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कृषी विभागाच्या उदासीन धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना वंचित ठेवून गावागावातून दोन-चार महिला शेतकऱ्यांची निवड करून ही योजना गुंडाळण्याचा प्रकार सध्या होत असल्याचे दिसून येत आहे. खरीप पेरणी हंगामाच्या तोंडावर राज्यात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा यंदा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
खासगी कंपन्यांचे महागडे बियाणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची प्रतीक्षा असताना बाजारात बियाणे मिळत नाही, कृषी विभागाचे मोफत बियाणे बोटावर मोजता येतील ऐवढाच महिला शेतकऱ्यांची निवड केली आहे.
या योजनेत शंभर टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र पुरुषांच्या तुलनेत 10 टक्के ही क्षेत्र महिलांच्या नावे नाही, त्यामुळे या योजनेतून 90 टक्के पुरुष शेतकरी वंचित राहत आहेत. महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याच्या नावाखाली 90 टक्के पुरुष शेतकरी वंचित ठेवण्याची चलाखी कृषी विभागाने केली आहे.
शेतकऱ्यांना पेरणीसाठी हातभार लागावा य उद्देशाने कृषी विभाग दर वर्षी अनुदानावर बियाणे वाटप करतो. या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागत असतो. मात्र यंदा कृषी विभागाने ज्यांना बियाणे पाहिजे आहे, त्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची सक्ती केली खरी. परंतु ऑनलाईन करुनही कृषी विभागाने महिलांना प्राधान्य देण्याच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात शेतकरी वंचित ठेवले आहे.
खासगी बीज कंपन्यांच्या खिसेकापू धोरणामुळे त्रस्त असलेले अनेक शेतकरी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी करतात. मात्र यंदा अपेक्षेच्या तुलनेत निम्माच बीजपुरवठा बाजारात झाल्याने सोयाबीन बियाण्याची बाजारात टंचाई भासत असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन बियाण्याची टंचाई भासू नये यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना स्वतःकडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले होते. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांकडे घरची बियाणे उपलब्ध नसल्याने कृषी केंद्रांसमोर शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला त्यामुळे मोफत मिळणाऱ्या कृषी विभागाच्या बियाण्याची वाट न पाहता महागड्या बियाण्यांची खरेदी केली आहे.
कृषी विभाग फसवणूक व पिळवणूक करीत असल्याची भावना बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे कृषी विभागाच्या आवाहनानंतर बियाणासाठी शेतकरी ऑनलाईन खर्च सहन करून अर्ज दाखल करतात. मात्र निवड होत नसल्याने शेतकरी हताश व निराश होतात. कृषी विभाग शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे....- सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.