Cement road cracks in just four months
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अन्वा-जळगाव सपकाळ या महत्त्वाच्या मार्गावरील नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला अवघ्या चार महिन्यांतच ठिकठिकाणी छोटे-छोटे तडे गेल्याचे चित्र समोर आले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची एवढ्या कमी कालावधीत दुरवस्था होऊ लागल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रस्त्याचे काम सुरू असतानाच ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी कामाच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवून संबंधित बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अन्वा-जळगाव सपकाळ रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याचे योग्य खोलीकरण होत नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. रस्त्याचा मजबूत पाया तयार करण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने खोलीकरण करणे गरजेचे असताना त्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. "रस्त्याचे योग्य खोलीकरण न करता काम केले तर भविष्यात रस्ता फुटेल, तडे जातील आणि काही वर्षांत रस्त्याची दुरवस्था होईल," अशी भीती ग्रामस्थांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
याबाबत ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी संबंधित बांधकाम विभागाकडे तक्रारी करून निवेदनही दिले होते. कामाच्या गुणवत्तेबाबत लक्ष घालावे, तांत्रिक निकषांनुसार काम करून घ्यावे आणि भविष्यात जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, तक्रारी करूनही कामाच्या पद्धतीत अपेक्षित बदल झाला नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. परिणामी, रस्ता पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच ठिकठिकाणी तडे पडल्याने त्यावेळी व्यक्त करण्यात आलेली भीती आता प्रत्यक्षात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तांत्रिक तपासणी नाही
विकासकाम सुरू असताना त्रुटी निदर्शनास आणून देणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यावेळीच तांत्रिक तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असत्या, तर आज रस्त्यावर तडे पडण्याची वेळ कदाचित आली नसती. रस्ता तयार झाल्यानंतर त्याची देखभाल करण्यापेक्षा काम सुरू असतानाच गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.