जालना ः महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे व त्यांच्या पत्नी सुशिला दानवे यांनी विजयी गुलाल उधळला. त्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संतोष दानवे, अभियंता विष्णू डोंगरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. pudhari photo
जालना

Jalna Municipal Election Results: सत्तासंर्घात अखेर भाजपाचीच सरशी

कमळ फुलले, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत महापालिकेवर स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 65 जागांच्या जालना महानगरपालिकेत भाजपाने तब्बल 41 जागांवर विजय मिळवला असून, इतर सर्व पक्षांना मोठा धक्का बसला आहे. या निकालामुळे जालना शहराच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी गुरूवारी शहरात मोठ्या उत्साहात मतदान झाले होते. आज शुक्रवार दि. 16 रोजी मतमोजणीला एमआयडीसी फेस 3 येथील सिध्दीकी इंजिनियरिंग येथे सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला. मतमोजणीदरम्यान सकाळपासूनच भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. दुपारपर्यंत अनेक प्रभागांत भाजपाने निर्णायक आघाडी घेतली, तर संध्याकाळपर्यंत बहुसंख्य जागांवर विजय निश्चित झाला. या निकालामुळे भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निकालानुसार भाजपानंतर शिवसेनेला 12 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला केवळ 9 जागा मिळाल्या. एमआयएमला 2 जागा मिळाल्या असून, अपक्ष उमेदवारांना फक्त 1 जागेवर यश मिळाले आहे. एकेकाळी शहराच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व इतर पक्षांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने त्यांच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले.

भाजपाच्या या विजयामागे संघटनात्मक ताकद, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रभाव, तसेच स्थानिक पातळीवर केलेला प्रचार महत्त्वाचा ठरल्याचे बोलल्या जात आहे. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच विकासकामांचा मुद्दा भाजपाने प्रचारात प्रभावीपणे मांडला. याउलट विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्याने मतांचे विभाजन झाल्याचेही चित्र दिसून आले. विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरभर जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांचे आभार मानत, “जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे आश्वासन दिले.

दरम्यान, विरोधी पक्षांनीही निकाल स्वीकारत आत्मपरीक्षण करण्याचे संकेत दिले आहेत. आगामी काळात महापालिकेच्या सत्तेतून भाजपाकडून कोणती विकासाची दिशा ठरवली जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जालना महानगरपालिकेवरील या विजयामुळे भाजपाचे राजकीय बळ अधिक वाढले असल्याचे दिसून आले.

सात मुस्लिम उमेदवारांनी मारली बाजी

महानगर पालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षातील 7 मुस्लिम समाजातील उमेदवारांना मतदारांनी निवडून दिले आहे. यात सर्वाधिक काँग्रेस 3, एमआयएम 2 तर शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एक या प्रमाणे मुस्लिम उमेदवार निवडून आले आहे. ते प्रभाग क्रमांक 11 अ, ब, क, ड, प्रभाग 12 क, प्रभाग 4 ब आणि प्रभाग 2 ड चे प्रतिनिधित्व करतील. यात सर्वाधिक अब्दुल सगीर अजीज शेख या शिवसनेच्या उमेदवाराल मतदान झाले आहे. सुमारे 4789 इतके मत त्यांनी मिळविली आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसचे इमरा खान अमानुल्ला खान यांना 4316 तर भाजपाचे मजहर समद सय्यद 3429 इतकी मत मिळाली आहे.

16 प्रभागांत नोटाला 11 हजार 90 मत

महापालिकेच्या निवडणुकीत नोटाला 16 प्रभागातून सुमारे 11 हजार 90 इतकी मते पडली. यात सर्वाधिक मते ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये पडली. सुमारे 951 इतकी मत नोटाला पडली. मतदारांनी नोटावर मतदान केले. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक 15 मध्ये 947 इतके मत पडली. तर तिसऱ्या क्रमांकाची मत प्रभाग क्रमांक 3 मध्ये पडली. या प्रभागातील मतदारांनी नोटाला 940 मते दिली.

पक्षीय बलाबल

भाजप - 41

शिवसेना - 12

काँग्रेस - 09

एमआयएम - 02

अपक्ष - 01

महाविकास आघाडीचा सफाया

महाविकास आघाडीने महापालिका निवडणुकीत एकमत करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय केला होता. यात काँग्रेसने 40 जागा, उबाठाने 13 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 12 जागा लढवल्या. मात्र, या निवडणूकीत काँग्रेसला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना खाते देखील उघडता आले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ

सन्मानजनक जागा मिळत नसल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला. 55 जागेवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपङा साफ झाला. राष्ट्रवादीला आपले खातेही उघडता आले नाही. यामुळे येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत काय रणनिती अवलंबविता येईल, या निकालाने पक्षाला चिंतन करायला भाग पाडले आहे.

आता लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे

भारतीन जनता पार्टीने महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. आता सर्वांच्या नजरा पहिल्या महापौर पदाकडे लागल्या आहेत. भाजपाने 65 पैकी 42 जागा मिळवून स्पष्ठ बहुमत विळविले आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच कोण पहिल्या महापौरपदाचा चेहरा कोण हे समोर येणार आहे.

मतमोजणी केंद्रावर उमेदवारास भोवळ

उमेदवार पिंटू रत्नपारखे यांना मतमोजणी केंद्रावर अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांना तत्काळ दवाखान्यात हलविण्यात आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT