पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील मका पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे.
पिकाला पाण्याची गरज असताना पावसाने हुलकाणी दिल्याने मका पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मकाची पेरणी केली होती. सुरुवातीला पिकाची वाढ चांगली झाली.
मकाच्या पिकाला सध्या कणीस फुटण्याची अवस्था आहे. ही अवस्था पिकासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या काळात पाण्याची जास्त गरज असते. मात्र गेल्या पचवीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीत ओलावा संपला आहे. पिकाची पाने गुंडाळली जाऊ लागली असून कणसे सुकू लागली आहेत.
तालुक्यातील अनेक भागात हिच परिस्थिती आहे. विहिरी तळ गाठला आहे. पाणी देण्याची सोय नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एका एकरासाठी वीस हजार रुपये खर्च करूनही उत्पादन हाती लागेल की नाही याची शाश्वती नाही. शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
मदत द्यावी- खत, बी-बियाणे, फवारणीसाठी कर्ज काढले. पीक चांगले आले होते, पण आता पाण्याविना जळून चालले आहे. सरकारने तातडीने पीकविमा आणि मदत द्यावी.समाधान तायडे, शेतकरी