बदनापूर : भंडारा मुकादमाला चांगलेच महाग पडले आहे. अज्ञात चोरट्याने सज्यावरील चावीनेच दरवाजा उघडून घरातील १ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथे घडली आहे.
गोकुळवाडी तांडा येथील रहिवासी सुनील गोपीचंद चव्हाण (वय ३८) हे शेती व्यवसायासोबतच ऊसतोड मुकादम म्हणून काम करतात. बुधवारी (दि. २६) दुपारी दीडच्या सुमारास सुनील चव्हाण कामानिमित्त चिखलठाणा येथे गेले होते, तर त्यांची पत्नी व मुले शेतात कामाला गेली होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास मुलगा कार्तिक आणि सूरज यांनी शेतातील काम आटोपून घराला कुलूप लावले आणि कुलपाची चावी नेहमीप्रमाणे दरवाजावरील सज्यावर ठेवून ते सोमठाणा येथील मंदिरात भंडारा जेवणासाठी गेले होते.
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले. पेटीत ठेवलेली १ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम, २० हजार रुपये किमतीची ४ ग्रॅम सोन्याची पोत आणि १५ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे वेल असा एकूण २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे निदर्शनास आले. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच मुलांनी तत्काळ वडिलांना फोनवरून माहिती दिली.
त्यानंतर सुनील चव्हाण यांनी बदनापूर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरावसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कामगारांना वाटप करण्यासाठी घेतली होती उचल
छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग कारखाना (चित्ते पिंपळगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथून ऊसतोड कामगारांना वाटप करण्यासाठी सहा लाख रुपयांची उचल (अॅडव्हान्स) घेतली होती. यातील कामगारांना पैसे वाटून उरलेली १ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने त्यांनी घरातील लोखंडी पेटीत सुरक्षित ठेवले होते.