जाफराबाद : तालुक्यातील आरदखेडा येथील शासकीय गायरान जमिनीवरील कथित अवैध गौण खनिज (मुरूम) उत्खनन प्रकरणात तब्बल दोन वर्षांनंतर अखेर जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रॅक्टर व जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपलब्ध कागदपत्रांनुसार, २४ एप्रिल २०२४ रोजी महसूल विभागाच्या पथकाने आरदखेडा येथील शासकीय गायरान जमिनीवर छापा टाकून अवैधरीत्या मुरूम उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले होते. यावेळी ट्रॅक्टर (एमएच-२८ एजे-८६९९) तसेच जेसीबी आढळून आली होती. या कारवाईचा पंचनामा करून संबंधित वाहनांद्वारे अवैध उत्खनन केल्याची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार सारिका भगत यांनी २१ जून २०२४ रोजी जाफराबाद पोलिस ठाण्याला संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतरही जवळपास दोन वर्षे कोणतीही गुन्हा नोंदविण्याची कारवाई झाली नाही. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हा खनिकर्म अधिकारी, जालना यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी १० एप्रिल २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार ग्राम महसूल अधिकारी अमोल हरिभाऊ मुरकुटे यांनी ४ जुलै २०२६ रोजी जाफराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत संबंधित वाहनचालकांनी कोणतीही वैध परवानगी अथवा रॉयल्टी न भरता शासकीय जमिनीवरून मुरूमाचे अवैध उत्खनन व वाहतूक करून शासनाचे नुकसान केले आहे.
दोन वर्षांच्या विलंबाबाबत प्रश्नचिन्ह
२०२४ मध्येच तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना प्रत्यक्षात एफआयआर नोंदविण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी का लागला, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या विलंबासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.