वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरातील ऊस पिकांवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला असून ७५ टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे ऊसउत्पादक शेतकरी यांना महागडी औषध फवारणी करावी लागत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
वडीगोद्रीसह, नालेवाडी, रेणापुरी, अंतरवाली सराटी, गुंडेवाडी, महाकाळा, भांबेरी, घुंगर्डे हदगाव इत्यादी गावामध्ये उसाचे क्षेत्र जवळपास ८० टक्के आहे. सलग चार वर्षांपासून पैठण येथील नाथसागर धरण भरत असल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड परिसरात भरपूर प्रमाणात केलेली आहे.
जिल्ह्यामधील सहकारी व खासगी साखर कारखाने त्याच प्रमाणे व पर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस नेण्यासाठी येत असतात. त्यामुळे ऊस गाळपाचा ही प्रश्न शेतकऱ्या समोर गंभीररीत्या येत नाही. त्यामुळे वडीगोद्री परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करत असतात. परंतु यावर्षी जून महिन्यापासून ते ऑगस्ट अर्धा संपेपर्यंत ऊस पिका योग्य पाऊस झालेला नाही. त्यात भरीस भर म्हणून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे.
यामुळे पहिलेच शेतकरी अस्मानी संकटात सापडलेला असताना परत नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. यामुळे शेतकरी सध्या १५ ते २० कांड्यावर असणाऱ्या ऊस पिकावर फवारणी करत आहे. उसाची एकंदरीत वाढ २० ते २२ फुटापर्यंत झालेली आहे. त्यामुळे फवारणी हाताना सुद्धा शेतकऱ्याला भयंकर त्रास होत आहे.
उसाच्या पानावर या पांढऱ्या माशीच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पान पिवळसर पडून त्यावर पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे ठिपके ठिपके पडत आहे. ड्रोन ने फवारणी करायची असल्यास त्यालाही बराच खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. यावर कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
एकरी चार हजार रुपयांचा खर्च
गहिनीनाथ नगर येथील शेतकरी आजिनाथ गोरख तांदळे यांच्या शेतात सुरू असलेल्या उसाच्या फवारणीच्या वेळी भेट दिली असता त्यांच्या १ एकर ऊस क्षेत्रावरील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जवळपास त्यांना ४ हजार रुपये एकरी औषधासह खर्च आला. त्यांनी गेल्या वर्षी ड्रोनने फवारणी केली होती. परंतु त्या फवारणीचा या रोगावर कसलाही फरक पडला नाही. यामुळे त्यांनी यावर्षी आपल्या शेतातील ऊस पिकावर पेट्रोल फवाऱ्याने फवारणी केली असता त्यामधील औषध लागू झाले असे त्यांनी सांगितले.
प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात अति प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यास पाणी पिवळी होऊन गळून पडतात. किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास कीड पानावर गोड पदार्थ सोडते. त्यामुळे पानावर काळी बुरशी तयार होते. परिणामी पानांमधील प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणजेच अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.संकेत डावरे, सहायक कृषी अधिकारी