All-Party Sit-in Protest in Condemnation of the Nasrapur Incident
जालना, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यातील भोर तालुका अंतर्गत नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ जालना शहरातील गांधी चमन येथे सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी, "पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे झालेल्या या अमानुष घटनेतील आरोपीला फासावर लटकवले पाहिजे. जालना शहरात झालेल्या या धरणे आंदोलनाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे,' असे सांगितले.
आंदोलनादरम्यान नागरिकांनी हातात फलक घेऊन निषेध नोंदविला. 'महिलांवरील अत्याचार बंद करा', 'आरोपींना फाशी द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांचा वतीने आमदार अर्जुनराव खोतकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर, राजाभाऊ देशमुख, राजेश राऊत, राजेंद्र राख, मा.आ. संतोष सांबरे पंडीत भुतेकर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख मनिष श्रीवास्तव मेघराज चौधरी, धनसिंग सूर्यवंशी, अशोक पडूळ, सिद्धिविनायक मुळे, रिमा काळे खरात, श्रीकांत पांगारकर संतोष दाणी मोहन ईगळे विलास कुलकर्णी महेश पुरोहित यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला
महिला, मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे : अॅड. रिमा काळे खरात
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करत नगरसेविका रिमा काळे खरात यांनी आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी केली. जालना शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री वाढल्याने गुन्हेगारी आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खटला फास्टट्रॅक कोर्टात न्या: भास्कर आंबेकर
नसरापूर प्रकरणातील आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. ही घटना अत्यंत निंदणीय आहे. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्याने गुन्हे वाढत आहे. या प्रकरणातील आरोपीला फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून तातडीने फाशीची शिक्षा द्यावी. यामुळे चिमुकलीला न्याय मिळेल, अशी भावना भास्कर आंबेकर यांनी व्यक्त केली.
आरोपीला फाशी द्या : उपमहापौर राऊत
जालना : उपमहापौर राजेश राऊत यांनी आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.