Agriculture News: No oxen in the cowshed, and no diesel for the tractor
भोकर, पुढारी वृत्तसेवा : शेतीचा भार ज्यांच्या मानेवर होता त्या बैलजोडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा सहारा घेतला. पण आज गोठे ओस पडले असून ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने पेरणीपूर्व मशागतीचे कामे खोळंबली आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना आता पशुधनाकडे वळावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भोकर तालुक्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथील माणसांचं जगणं शेतीवर अवलंबून आहे. मागील पंचवीस वर्षांत भोकर तालुक्यातील लोकसंख्या वाढली. पण शेती मात्र वाढली नाही. भौगोलिकदृष्ट्या अतिशय मागसलेला हा तालुका असून या ठिकाणी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा कणा सदानकदा वाकलेला असतो.
शेती तेवढीच राहिली पण लोकसंख्या वाढल्यामुळे एका घराचे चार घरे झाले. एका सातबाऱ्यावर चार नावे आली. पुढे या चार सातबाऱ्याचे आठ ते सोळा सातबारे झाले. जमीनीचे तुकडे होत गेले. मोठा वतनदार म्हणून ओळखले गेलेल्या आजोबांचे नातवं आता अल्पभूधारक शेतकरी झाले. लोकसंख्या वाढीमुळे प्रत्येक गाव शहरात वाढीव वस्ती झाली.
अकृषिक कारणासाठी होत असलेला वापर यामुळे शेती कमी होत गेली. तालुक्यातील ६४ टक्के शेतकऱ्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता बैल सांभाळणे जिकिरीचं झाले. यामुळे ७० टक्के शेतकरी आपली शेती ट्रॅक्टरवर करीत आहेत.
शेती कमी झाली असल्याने बैला विना गोठे रिकामे झाले. आज घडीला डिझेल ला प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. काही पेट्रोल पंप बंद तर काही पेट्रोल वर थोड्या वेळासाठी वाहनांच्या आणि डिझेल घेऊन जाण्यासाठी डब्याच्या रांगा लागत आहेत. पण डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर ची भुरभुर कमी झाली. सध्या पेरणीपूर्व मशागतीचे कामे करणे आवश्यक आहे.
परंतु, डिझेल मिळत नसल्याने ही कामे खोळंबली आहेत. गोठ्यात बैल नाहीत आणि ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेती करणे अवघड झाले आहे. मृगात मोठा पाऊस झाला अन् डिझेलचा तुटवडा असाच राहिला तर यावर्षी शेती पडित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असल्याने सध्या शेतकरी ट्रॅक्टरवर शेती करीत आहेत. जर डिझेलच्या बाबतीत अशीच परिस्थिती राहिली तर पेरणीसह शेतातील इतर कामे करणे अवघड झाले आहे.
अगोदर विविध योजनेतून सरकार फुकट देण्याचे धोरण अवलंबिले असल्याने शेतीच्या कामाला मजूर मिळणे कठीण झाले आणि डिझेलअभावी ट्रॅक्टर शेतात नाही आले, तर शेतकऱ्यांना हातात कटोरा घेऊन भिक मागण्याची वेळ येणार आहे.