जालना : शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जालना शहर महानगरपालिकेकडून जुन्या जालना परिसरात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. भाजीमंडी परिसरातील सुमारे 70 दुकानांसमोरील नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून नाले मोकळे करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक आणि स्वच्छतेचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये तसेच सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. सकाळपासूनच मनपाचे अतिक्रमण पथक, स्वच्छता विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत भाजीमंडी परिसरातील नाल्यांवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि इतर अतिक्रमणे हटवली.
या मोहिमेत अतिक्रमण पथकप्रमुख बी. सी. राठोड, सहाय्यक शामसन कसबे, स्वच्छता निरीक्षक शोएब खान, मांस प्रतिबंध कार्यवाही प्रमुख अमजद खान, लिपिक अजय पेम्बर्ती, उत्तम लाडाने, कादर खान, आमेर खान यांच्यासह 20 ते 25 कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान 1 जेसीबी, 1 टिप्पर तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले.
मनपा प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक दुकानांनी नाल्यांवर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले होते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे, दुर्गंधी आणि स्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण होत होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.
दरम्यान, ‘नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे आवाहन सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांनी केले. शहरातील विविध भागांत अतिक्रमण हटाव मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनपाच्या या कारवाईमुळे भाजीमंडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस बंदोबस्तामुळे कारवाई शांततेत पार पडली.
दोन पथकांच्या माध्यमातून कारवाई
शहर महानगर पालिकेच्यावतीने शहरात झालेले अतिक्रमण काढण्यासाठी दोन पथकं तैनात करण्यात आले आहे.
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
नागरिकांनी केलेले अतिक्रमण स्वता:हून काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.