Delhi Student Lathi Charge Condemned
वसमत : नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा वसमत वकील संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी (ता. २४) राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जंतरमंतर येथे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या कथित पोलिस कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारच्या घटना लोकशाही व्यवस्थेला शोभणाऱ्या नसून, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखला जावा, अशी भूमिका वकील संघाने मांडली आहे.
या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने संवेदनशीलतेने लक्ष देऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर वसमत वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र साखरे, सचिव ॲड. दीपक मुरुंबेकर, उपाध्यक्ष ॲड. शेख मोहसीन शेख करीमोद्दीन, सहसचिव ॲड. केतनकुमार सारंग, कोषाध्यक्ष ॲड. नाहीद सिद्दीकी, ग्रंथालय सचिव ॲड. विनोद खोते, महिला प्रतिनिधी ॲड. साक्षी सचिन जोशी यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.