हिंगोली : लग्नासाठी जात असलेल्या पाहुण्यांची स्कार्पिओ अडवून 10 ते 12 जणांच्या टोळक्याने वाहनाची तोडफोड करत सहा तोळे वजनाची सोन्याची चैन पळविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा शिवारात घडली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील अशोक घुगे हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी स्कार्पिओने साखरा येथे जात होते. लिंबाळा तांडा शिवारात चालकाने पाणी पिण्यासाठी वाहन थांबवले असता, अचानक 10 ते 12 जणांचे टोळके तिथे आले. या टोळक्याने कोणतीही विचारपूस न करता काठ्या आणि लोखंडी रॉडने वाहनावर हल्ला चढवला. या हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या घुगे यांनी सेनगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. अशोक घुगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शंकर नवले, दामू नवले आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस जमादार पवन चाटसे पुढील तपास करीत आहेत.
मारहाण करून दागिने पळवले
टोळक्याने अशोक घुगे व त्यांच्यासोबत असलेल्या इतरांना गाडीबाहेर खेचून बेदम मारहाण केली. या गोंधळाचा फायदा घेत जमावातील शंकर नवले (रा. सावंगा म्हाळसा) याने अशोक यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतली. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.