Police recruitment: Another chance for absent candidates
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज दाखल केलेले अर्धेधिक उमेदवार गैरहजर राहिले असून या उमेदवारांना अखेरची संधी म्हणून पुरुष उमेदवारांना ४ मार्च व महिला उमेदवारांना ५ मार्च रोजी पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हा पोलिस दलात एकूण ६४ पदासाठी भरती प्रक्रिया ११ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली. याभरतीमध्ये शिपाई पदाच्या ३७ तर चालक पदाच्या २७ जागांचा समावेश असून यासाठी तब्बल १३ हजार २०० उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते.
त्यानुसार संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, त्यानंतर शारिरीक चाचणी झाल्यानंतर त्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेत अध्यपिक्षा अधिक उमेदवार गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. सदर उमेदवार काही अडचणीमुळे भरती प्रक्रियेसाठी हजर राहू शकले नसल्याचे गृहीत धरून कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होऊ नये यादृष्टीकोनातून त्यांना एक संधी देण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घेतला आहे.
४ अन् ५ मार्चला हजर राहण्याचे आवाहन
त्यानुसार या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल केले आहे मात्र काही अडचणीमुळे शारिरीक चाचणी, व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलेले उमेदवार हजर राहू शकले नाही त्या उमेदवारांपैकी पुरुष उमेदवारांना ४ मार्च रोजी व महिला उमेदवारांसाठी ५ मार्च रोजी सकाळी साडेचार वाजता संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेसाठी हजर राहता येणार आहे. उमेदवारांसाठी हि अखेरची संधी असून अडचणीमुळे गैरहजर असलेल्या उमेदवारांनी यावेळी हजर रहण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.