औंढा नागनाथ: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांची नियुक्ती झालेली असली, तरी आता या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या हालचाली आणि नियोजित वेळापत्रकानुसार, ४ मे २०२६ नंतर राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राबवला जाणार आहे:
२० फेब्रुवारी २०२६: गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचनेचे कच्चा आराखडा तयार करणे.
२७ फेब्रुवारी २०२६: तलाठी व ग्रामसेवकांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व सीमा निश्चिती.
११ मार्च २०२६: प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे.
२३ ते ३० मार्च २०२६: राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला प्राथमिक मान्यता.
७ एप्रिल २०२६: प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदवण्याची अंतिम मुदत.
४ मे २०२६: राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी व प्रसिद्धी.
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक बडे नेते आता आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीकडे वळणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, यंदा सरपंचाची निवड थेट मतदारांमधून होणार असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होताच, निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी मतदानाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.