Increase in patient numbers due to climate change
औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा :
वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि उष्णता वाढल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यासोबतच येथून रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे प्रमाण सुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सर्दी, खोकला, ताप, हात, पाय, अंग दुखणे, डोकं दुखणे, थंडी ताप वाढणे आदी रुग्ण वाढले आहेत. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे विविध आजाराने डोके वर काढले आहे. तालुक्यामध्ये सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून शिरड शहापूर, पिंपळदरी लोहरा, जवळा बाजार, नव्याने सुरू झालेले सिद्धेश्वर या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे रुग्णांना वेळीच आरोग्य सुविधा मिळत नाहीत. याचाच परिणाम औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात उपचारास येणाऱ्या रुग्णाच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे. परिणामी रुग्णालयाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
विशेषतः ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसून वैद्यकीय अधिकारी सुद्धा बहुतांश वेळा उपस्थित राहत नाहीत. वैद्यकीय अधीक्षक सुद्धा मोठ्या शहराच्या ठिकाणाहून ये जा करून ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाहत असल्याने रुग्णालयाच्या कार्यप्रणालीमध्ये व प्रशासनाबाबत साशंकता व्यक्त होते.
प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना आणि अपघातामध्ये गंभीर जखमींना बहुतांश वेळा जिल्हा रुग्णालयाकडेच पाठवण्याची एक प्रकारे येथे प्रथा पडली आहे. १६ मार्चपासून हवामान विभागाने पुन्हा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने वातावरणामध्ये कमालीचा बदल दिसून येत आहे.
यामुळे नवीन रुग्णांच्या संख्येत निश्चितच वाढ होणे अपेक्षित आहे. सर्वच रुग्णांना खाजगी रूग्णालयामध्ये महागडे उपचार करून घेणे परवडत नसल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्यासाठी धडपड करीत असून उपचार वेळीच व योग्य मिळत नसल्यामुळे रुग्णांची मात्र हेळसांड होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यामध्ये सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून शिरड शहापूर, पिंपळदरी, लोहरा, जवळा बाजार, नव्याने सुरू झालेल सिद्धेश्वर ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी निवासी स्वरूपात राहत नसल्यामुळे रुग्णांना वेळीच आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे रूग्णांची गैरसाये होत आहे.
एकंदरीत तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत असून ग्रामीण रुग्णालयात मात्र रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रवाना करण्याची एक प्रकारे प्रथाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे