हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : एक नव्हे दोन नव्हे, तर तीन योजना राबवून देखील गावात उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई कमी करण्यात प्रशासनाला यश येत नाही. याच्या निषेधार्थ औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे तरुणांनी जलकुंभावर चढून आज (दि.27) आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
गावात पाणी मिळत नसल्याने लोकांनी अगोदरच जिल्हा प्रशासनाला ही बाब कळवली होती. परंतु कुठली दखल घेतली गेली नसल्याने युवकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे जल जीवन मिशन अगोदर गावात दोन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेले आहेत. परंतु एकही टाकी लोकांच्या तहान भागवण्यास कामी पडत नाही. शिवाय गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत देखील फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नित्याचीच झाली आहे.
येहळेगाव सोळंके येथे तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती मिळताच औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी हिंगोली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते नरवाडे, अभियंता बोरकर यांची उपस्थिती होती. लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती शुभम सोळंके यांनी दिली.