Hingoli Sengaon Schoolgirls Bus Protest
सेनगाव : सेनगाव तालुक्यातील साखरा केंद्रीय प्राथमिक शाळेअंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकास मिशनची बस उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. बोरखेडी (पिं.), बोरखेडी तांडा, साखरा तांडा यासह परिसरातील शाळकरी मुला-मुलींनी सेनगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर ढोल बजाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
साखरा येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळेसह विविध खासगी शाळा आणि महाविद्यालये आहेत. परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज साखरा येथे ये-जा करतात. काही विद्यार्थी सायकलने, तर काही विद्यार्थी पायी प्रवास करून शाळेत पोहोचतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि गवत वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाकडून शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेषतः मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेली मानव विकास बस उपलब्ध होत नसल्याने या योजनांच्या उद्देशालाच बाधा येत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून साखरा शाळेच्या मुख्याध्यापकांनी मानव विकास मिशनची बस उपलब्ध करून देण्याची मागणी हिंगोली आणि सेनगाव येथील परिवहन विभागाकडे केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही या मागणीची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप पालकांनी केला.
बस उपलब्ध न झाल्याच्या निषेधार्थ बोरखेडी (पिं.), बोरखेडी तांडा, साखरा तांडा यांसह परिसरातील पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली सेनगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर ढोल बजाव आंदोलन केले.
‘आम्हाला मानव विकासची बस उपलब्ध करून द्या’, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली असून, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मागणीची वेळीच दखल घेऊन मानव विकास बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.